कुडाळी नदीच्या पाण्याचा रंग बदलल्याने नागरिकांनी घ्यावी काळजी
प्रतापगड कारखाना चेअरमन सौरभबाबा शिंदे यांचे नागरिकांना आवाहन

कुडाळ : वास्तवनामा वृत्तसेवा
जावळी तालुक्यातील महू धरणातून कुडाळी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.दरम्यान विसर्ग करण्यात आलेल्या पाण्याचा रंग मंगळवारी हिरवा थर असलेले पाणी कुडाळी नदीतून वाहत आहे.त्यामुळे मंगळवारपासून वाहत येणाऱ्या या दूषित पाण्याचा अहवाल येईपर्यंत नदीकाठच्या नागरिकांनी पाणी उकळून प्यावे असे आवाहन प्रतापगड कारखाना चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांनी केले आहे.
महू धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत नसल्याने या धरणात बारा महिने पाण्याचा स्टॉक शिल्लक राहतो .दरम्यान पाटबंधारे खात्याने धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला आहे. विसर्ग केलेले पाणी मंगळवारपासून दूषित व हिरवा थर असलेले वाहत आहे. या पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नये यासाठी हे पाणी पिताना नदीकाठच्या गावांनी उकळून प्यावे असे आवाहन शिंदे यांच्याकडून करण्यात आले आहे.
पाटबंधारे विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील ही बाब गंभीरपणे घ्यावी. नेमके हे पाणी दूषित आहे की कोणत्या कारणामुळे पाण्याचा रंग बदललेला आहे. याचे स्पष्टीकरण दोन दिवसात द्यावे अशी मागणी कुडाळ,करहर विभागातील नागरिकांकडून होत आहे.



