जनतेच्या सुखदुःखात कायम सोबत राहिल्याने जनता माझ्याच पाठीशी :- प्रशांत तरडे

कुडाळ: वास्तवनामा वृत्तसेवा
शिवसेनेत प्रामाणिक काम करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता असून, जावळी तालुक्यात कायम मी जनतेच्या सुखदुःखात त्यांच्यासोबत राहिलो आहे. याची जाण नक्कीच जनतेला असून या निवडणुकीत कुडाळ गणातील जनता माझ्याच पाठीशी राहील असा आत्मविश्वास कुडाळ पंचायत समिती गणाचे उबाठा गटाचे उमेदवार प्रशांत तरडे यांनी व्यक्त केला आहे.
सत्ताधारी राजकीय पक्षाकडून गेल्या काही वर्षात घराणेशाही आणि पैसा बघून सर्वसामान्य जनतेवर उमेदवार लादण्याचाच प्रकार घडला आहे. त्यामुळे या लादलेल्या उमेदवारांच्या बाबत प्रचंड नाराजी व अशा पक्षांविरुद्ध रोष कुडाळ गटातील जनतेत दिसून येत आहे. त्यामुळे तब्बल नऊ वर्षानंतर होणारी ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच राहील, असे मत व्यक्त करीत कुडाळ गणातील बामणोली हे गाव मोठ्या मतदारसंख्येचे आहे. तरीसुद्धा या गावाला उमेदवारी देण्याबाबत सातत्याने डावलले गेले आहे. ग्रामस्थांच्या मनात ही सल असून ग्रामस्थांच्या पाठींब्यावरच मी माझा उमेदवारी अर्ज या गणातून दाखल केलेला आहे.त्यामुळे सर्व ग्रामस्थ माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत.
राज्यात ज्यावेळी शिवसेना महायुतीचे सरकार होते. त्यावेळी सुमारे 30 वर्षांपूर्वी जावळी तालुक्यासाठी क्रीडा संकुल मंजूर करण्यात आले होते. परंतु अद्यापही क्रीडा संकुल होऊ शकले नाही. परिणामी क्षमता असून सुद्धा जावली तालुक्यातील क्रीडापटूंना क्रीडांगण आणि योग्य प्रशिक्षण मिळू शकत नाही. हे अपयश नेमके कोणाचे?
तर महू-हातगेघर धरणे पूर्ण झालेली असताना देखील अद्याप या धरणातून तांब्याभर पाणी देखील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचलेले नाही. यामुळे त्रस्त व तहानलेली जावळीतील शेतकरी,कष्टकरी जनता या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवेल.असा विश्वास तरडे यांनी यावेळी व्यक्त केला.
मतदारांनी या निवडणुकीत मशाल या चिन्ह समोरील बटन दाबून तुमच्या-आमच्या मनातील असणारा उमेदवार म्हणून आपले बहुमोल मतदान देऊन मला विजयी करावे असे आवाहन प्रशांत तरडे यांनी यावेळी केले.



